Add parallel Print Page Options

ईयोब उत्तर देतो

12 नंतर ईयोबाने उत्तर दिले:

“तुम्हीच फक्त शहाणे आहात
    असे तुम्हाला वाटते याबद्दल माझी खात्री आहे.
तुम्ही मेल्यानंतर तुमच्याबरोबरच शहाणपणाही जाईल
    असे तुम्हाला वाटते.
माझेही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे,
    मीही तुमच्या इतकाच हुशार आहे.
    कोणालाही दिसेल की सत्य आहे.

“माझे मित्र मला आता हसत आहेत.
    ते म्हणतात, ‘त्याने देवाची प्रार्थना केली आणि त्याला उत्तर मिळाले.
    केवळ त्यामुळेच एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या.’
मी चांगला आहे मी निष्पाप आहे,
    पण तरीही ते मला हसतात.
ज्यांच्यावर संकटे येत नाहीत तेच लोक संकटे कोसळलेल्या लोकांना हसतात.
    तेच लोक खाली पडलेल्याला मारतात.
परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात.
    जे लोक देवाला क्रोध आणतात ते शांततेने राहातात.
    केवळ त्यांची स्वतःची शक्तीच त्यांचा देव असतो.

“तुम्ही प्राण्यांना विचारा,
    ते तुम्हाला शिकवतील किंवा
हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना विचारा
    ते तुम्हाला सांगतील.
किंवा पृथ्वीला विचारा,
    ती तुम्हाला शिकवेल.
समुद्रातल्या माशांना त्यांचे
    शहाणपण सांगू द्या.
या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत
    हे सर्वांना ठाऊक आहे.
10 जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा
    प्रत्येक माणूस देवाच्या अधिपत्याखाली असतो.
11 ज्याप्रमाणे तोंडाला आवडत्या आणि नावडत्या अन्नातील फरक कळतो
    त्याप्रमाणे कानालाही शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या शब्दातील फरक कळतो.
12 ‘वृध्द् माणसे शहाणी असतात.
    दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो.’
13 ईयोब आणखी म्हणाला, देवाच्या ठायी विद्वत्ता आणि सामर्थ्य आहेत.
    त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे.
14 देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांना ती परत उभारता येत नाही.
    देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
15 देवाने जर पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल
    आणि जर त्याने पावसाला मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
16 देव सर्वशक्तीमान आहे आणि तो नेहमीच जिंकतो.
    जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाचे आहेत.
17 देव उपदेशकांना त्यांच्या विद्वत्तेपासून वंचित करतो
    आणि पुढाऱ्यांना मूर्खासारखे वागायला लावतो.
18 राजांनी जरी लोकांना तुरुंगात डांबले तरी देव त्यांची सुटका करतो.
    आणि त्यांना सामर्थ्यवान बनवतो.
19 तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो
    आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
20 देव विश्र्वासू उपदेशकांना गप्प बसवतो
    आणि वृध्दांची विद्वत्ता काढून घेतो.
21 तो पुढाऱ्यांचे महत्व कमी करतो
    आणि शासकांची सत्ता काढून घेतो.
22 देवाला काळीकुटृ रहस्ये माहित असतात.
    मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
23 तो राष्ट्रांना महान आणि सामर्थ्यवान बनवतो
    आणि नंतर तो ते नष्ट करतो.
तो देशांना मोठे होऊ देतो
    आणि नंतर त्यांतील लोकांना विखरवून टाकतो.
24 देव नेत्यांना मूर्ख बनवतो.
    तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो.
25 हे नेते अंधारात वाट शोधणाऱ्या माणसाप्रमाणे असतात.
    दारु प्यायलेल्या माणसाला जसे आपण कुठे जात आहोत ते कळत नाही, तसे ते असतात.”